Saturday, February 1, 2020

'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया....' - साहिर लुधियानवी !! - ओंकार करंदीकर


 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया....' -  साहिर लुधियानवी !! -  ओंकार करंदीकर


Artcile on Sahir Ludhianvi by Onkar Karandikar


संगीत ऐकणं हा माझ्या जगण्याचा एक खूप मोठा भागच बनून गेलेला आहे. त्यातही जुन्या हिंदी चित्रपटातली म्हणजे 'गोल्डन एरा' मधली गाणी ऐकणं मला खूप आवडतं. सगळीच जुनी गाणी आवडतात असं नाही, पण प्रमाण नक्कीच खूप जास्त आहे.

आई ने लावलेल्या रेडिओमुळे अगदी लहान असल्यापासून नकळत ही गाणी कानावर पडत गेली आणि आपोआप आवडत ही गेली. पुढे मोठं झाल्यावर मोबाईल आणि इंटरनेट मिळाल्यावर कुठलंही चांगलं गाणं कानावर पडलं की ते लगेच सर्च करून ऐकायचा छंद चं लागला, हळुहळू त्याचं वेडात रूपांतर झालं आणि मग एकचं गाणं अनेक वेळा लूप वर लावून ऐकणं सुरु झालं. मग गाण्यांच्या अनुषंगाने आजूबाजूचं वाचणं सुरु झालं. बाबांनी माझं हे वेड (त्यांच्या कडूनच आलं असावं) पाहून २ सुंदर पुस्तकं हातात ठेवली ती वाचून ज्ञानात भरपूरचं भर पडली, पण त्याही पेक्षा जास्त गोल्डन एरा विषयी प्रेम अधिकचं वाढलं.
(ह्या पुस्तकांची नावं मी मुद्दाम इथे नमूद करेन- माधव मोहोळकर यांचं 'गीतयात्री' आणि अंबरीश मिश्र यांचं 'शुभ्र काही जीवघेणे'.) शिवाय 'क्लासिक लिजंड्स विथ जावेद अख्तर' आणि 'गोल्डन एरा विथ अन्नू कपूर' हे शोज ही होतेच सोबतीला.

आता या सगळ्या मध्ये गाण्याचं सुंदर म्युझिक ऐकणं तर आलंच, पण सर्वप्रथम कुठे लक्ष जात असेल तर ते शब्दांवर आणि ह्या वेड लावणाऱ्या शब्दांचा जन्मदाता कोण हे शोधणं हे तर बाय डिफॉल्टच होऊ लागलं आणि ते आजही चालूच आहे. जसं जसं मी ह्या जुन्या गाण्यांमध्ये खोल खोल घुसत गेलो तसं तसं मग अनेक गायक-गायिका, संगीतकार आणि गीतकार माहित झाले, त्यातले काही हृदयात एकदम उच्च स्थानी जाऊन बसले. काहींपुढे नतमस्तक झालो.

अशाच महान लोकांच्या मांदियाळीत एक माणूस होता ज्यानी खूप मोजकं काम केलं पण ते असं केलं की त्याच्या शब्दांची लोकं आजही आठवण काढतात आणि काढत राहतील. त्याच्या शब्दांनी लोकांना जगायला शिकवलं, वेगळी दृष्टी दिली, त्यांच्या दुःखावर फुंकर घातली आणि काळजात आग ही पेटवली. त्याला ही दुनिया जशी दिसली तशी त्यानी परखड पणे आणि अत्यंत चोख शब्दात आपल्या लेखणीतून मांडली. अत्यंत प्रामाणिक पणे सांगायचं तर त्याची उर्दू शायरी काही फारशी मी वाचलेली नाही अजून पर्यंत, पण त्यानी त्याच्या फिल्मी गाण्यांत  सुद्धा अशी पोएटिक डेप्थ दिली की ती गाणी फिलॉसॉफी बनून गेली.

त्याचं नाव होतं साहिर लुधियानवी!!

त्यानी गुरु दत्त सारख्या महान फिल्म मेकर्स सोबत आणि एस डी बर्मन, ओ पी नय्यर सारख्या महान संगीतकारांसोबत काम केलं. मोहम्मद रफी नी त्याची कित्येक गाणी गायली.

फाळणी नंतर साहिर मुंबई ला आला. आपसूकचं हिंदी चित्रपट सृष्टीत आपली किस्मत अजमावू लागला. त्याआधी आत्ताच्या पंजाब मधील लुधियाना इथे तो जन्मला, १० व्या वर्षी आई बाप वेगळे झाल्यावर, श्रीमंत बापाला सोडून आई सोबत गेला. त्याच्या त्या वेळच्या आणि नंतर च्या ही खाजगी आयुष्यात मला शिरायचं नाही.  हा थोडा तपशील अश्या साठी दिला की काय परिस्थितीत तो मोठा झाला. श्रीमंत घरात जन्मलेला असूनही ही रस्त्यावर फिरून सामान्य लोंकांचं जीवन त्यानी खूप जवळून पाहिलं, नव्हे ते तो स्वतःच जगला. २३-२४ वर्षाचा असताना त्याच्या उर्दू गझल्स आणि कवितांचा संग्रह लाहोर मध्ये प्रसिद्ध झालेला होता आणि तरुणांना त्यांनी वेड लावलेलं होतं.

बरेच वेळा गाण्याची ट्यून आधी बनते आणि त्यावर शब्द गीतकाराकडून लिहून घेतले जातात आणि त्यातही बेमालूमपणे  सुंदर लिहिणारे मजरूह सुलतानपुरी आणि शैलेंद सारखे प्रतिभावान आणि महान गीतकार त्यावेळी बॉलीवूड ला लाभलेले होते, साहिर ने ही काही वेळा अशी गाणी लिहिली आणि छान च लिहिली पण अनेकवेळा असंही झालं की साहिर ने आधीच लिहिलेल्या नज्म आणि गझल्स वाचून संगीतकारांना मोह आवरला नाही आणि त्यांनी त्या थोडे बदल करायला सांगून किंवा जश्या च्या तश्या सुद्धा फिल्म्स मध्ये वापरल्या.

साहिर काय ताकदीचं लिहायचा याची काही उदाहरणं मी देतो. सोपं आणि तरीही खूप परिणामकारक, खोल लिहिणं सगळ्यात जास्त अवघड असतं. ते त्याला साधलेलं होतं. वेगवेगळ्या मूड्स ची गाणी त्यानी लिहिली.

'तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले, 
अपने पे भरोसा है तो एक दाँव लगा ले''

हे 'बाजी ' चित्रपटातलं गीता दत्त ने गायलेलं गाणं ही असंच कमाल! सिनेमातल्या 'देव आनंद' च्या सिचुएशनला तर लागू होईल चं पण सिनेमाच्या बाहेर खऱ्या आयुष्यात सामान्य माणसाला ही खूप मोठा आधार आणि उमेद देईल असे या गाण्याचे शब्द. तीनही अंतरे सोपेपण खूप काही सांगून जाणारे लिहिलेत.

'डरता हैं जमाने की निगाहों से भला क्यूँ ?
इंसाफ़ तेरे साथ है, इल्ज़ाम उठा ले' 

सतत आपण लोकं काय म्हणतील म्हणून अनेक निर्णय घेताना घाबरतो त्यावर साहिर ने नेमकं बोट ठेवलंय.

नंतर तो असं लिहितो की,

टूटे हुए पतवार है कश्ती के तो ग़म क्या?
हारी हुई बाहों को ही पतवार बनाले' 

म्हणजे किती ही अडथळे आले आणि थकलेले असलो तरी 'शो मस्ट गो ऑन' !

आणि तो असंही म्हणतो की सगळंचं जगणं स्वतःहा साठी नसतं कधी तरी दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून आपण खेळ सुरु ठेवला पाहिजे आणि त्यात हरलो तरी बेहत्तर.

'क्या खांक वो जीना है जो अपने ही लिए हो
खुद मिट के किसी और को मिटने से बचाले' . 

साहिरचं असंच अजून एक जीवन तत्वज्ञान सांगणारं गाणं आहे आणि ते तर खूपचं फेमस आहे.
'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, 
हर फ़िक्र को धुवें में उडाता चला गया' 

या मध्ये एक प्रकारचा बेफिकीरपणा आहेच पण अनेक संकटं, दुःखं आणि धक्के पचवून आलेली विरक्ती सुद्धा आहे, कारण याच गाण्यात साहिर पुढे म्हणतो-

'ग़म और ख़ुशी मैं फ़र्क न महसूस हो जहाँ,
मैं दिल को उस मक़ाम पे लाता चला गया'

या ही गाण्याचे पूर्ण लिरिक्स इथे द्यायला मला आवडलं असतं, पण साहिर च्या सगळ्याचं गाण्यांचे शब्द इतके सुंदर असतात आणि एक दोन ओळी नव्हे तर संपूर्ण गाणं सुंदर असतं हे वैशिष्ठ्य आणि हे सगळंच इथे लिहीत बसलो तर हा लेख म्हणजे नुसतं गाण्यांचं संकलन होऊन बसेल त्यामुळे मी नाईलाजाने  पुढे जातो.

हिंदू-मुसलमान संघर्ष असेल नाहीतर अजून कुठला धर्मावर किंवा जातीभेदावर आधारलेला संघर्ष असेल, शेकडो वर्ष झाली, माणसाची इतकी प्रगती झाली तरी समाजाला लागलेली ही कीड काही अजून गेलेली नाही, त्या विषयी साहिर नी ६० वर्षांपूर्वी लिहिलेल्या गीताचे काही शब्द सांगतो आणि आता ही आजूबाजूला जे चाललंय ते बघता तरुणांनी ते खरोखरच आत्मसात करावे आणि प्रौढांनी ही केले तर उत्तमचं.

साहिर नी लिहिलं होतं-

'तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा,
इन्सान की औलाद है तू इन्सान बनेगा' 

हे गाणं जर पूर्ण ऐकलं तर असं लक्षात येईल की, जन्माला येताना सगळी बाळं सारखीच असतात निरपराध निर्गुण, नंतर त्यांच्यावर धर्माचे जे संस्कार होतात त्यामुळे त्यांची मानसिकता तशी बनत जाते आणि हे सगळं आता थांबलं पाहिजे यावर साहिर एका ओळीत लिहितो की-

'तू बदले हुए वक़्त की पहचान बनेगा .. ' 

अजून एक महत्वाची गोष्ट इथे सांगितलीच पाहिजे.

'ताजमहाल' हे प्रेमाबिमाचं प्रतीक आणि जगातलं एक आश्चर्य मानलं जातं, पण ते बांधण्यासाठी त्या मुघल बादशहाने हजारो सामान्य माणसाचं रक्त सांडलं, त्यांचं जीवन उध्वस्त केलं हे आपण विसरतो पण साहिर ते विसरला नाही.  त्याची एक अत्यंत सुंदर नज्म आहे-

'मेरी महबूब कही और मिला कर मुझसे... ' 

ह्यात तो बादशाह ने सामान्य लोंकांवर केलेल्या जुलमांविषयी तर लिहितोचं आणि असंही  म्हणतो की ज्या सामान्य लोकांच्या बळावर हा ताजमहाल बांधला गेला त्यांच्या प्रेमाचं काय ?त्यांनीही प्रेम केलं असेल, त्याची काहीच किंमत नाही ? का तर ते गरीब होते म्हणून ?

'एक  शहंशाह ने दौलत का सहारा लेकर 
म ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक़ ' .

'प्यासा' हा गुरु दत्त ने बनवलेला एक महान चित्रपट होता. त्यात अर्थातच साहिर ची गाणी आणि नज्म होत्या. खरतर साहिरच्याचं आयुष्यावर हा चित्रपट लिहिलंय की काय असं वाटावं इतकं त्याच्या आयुष्यात आणि चित्रपटातल्या नायकाच्या आयुष्यात साधर्म्य होतं आणि त्यामुळे साहिर ने लिहिलेली सगळी गाणी इतकी आतून आलेली आहेत.

मी फक्त्त त्यातल्या २ गाण्यांविषयी सांगतो. ही दोन्ही ही गाणी काळीज पिळवटून टाकतात. त्याला एस डी बर्मन साहेबांनी इतकं अप्रतिम संगीत दिलेलं आहे, कुठेही ते शब्दांना वरचढ होणार नाही, फक्त त्यांना सोबत घेऊन पुढे जाईल याची त्यांनी काळजी घेतलेली आहे, काही वेळा कमी संगीत आणि मिनिमम ऑर्केस्ट्रायझशन खूप प्रभावी होऊन जातं.

त्यातलं एक गाणं आहे-

'जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला
हमने तो जब कलियाँ मांगी, काटों का हार मिला '

हे संपूर्ण गाणं अतिशय सुंदर आहे, पण नुसता हा मुखडा ऐकला तरी कळतं ते लिहिणाऱ्याची अवस्था काय असावी आणि जगात अशी अनेक लोकं आहेत ज्यांचं कोणावर तरी खरं पण एकतर्फी प्रेम असतं आणि ते कधीच यशस्वी होण्याची शक्यताही नसते किंवा ज्यांचं ब्रेक-अप झालेलं असतं ... अश्या सगळ्यांच्या काळजाला साहिर एका ओळीत हाथ घालतो.

ह्यात सगळयात महत्वाचं असं की या ही परिस्थितीत तो जीवनाशी असलेली झुंज सोडत नाहीये, कारण तो पुढे म्हणतो -

'इसको ही जीना कहते है तो यूँही जिलेंगे.. '

आता दुसरं गाणं- मोहोम्मद रफ़ी साहेबांनी गायलेलं हे माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे.

'ये दुनिया अगर मिल भी जाये  तो क्या है....  ' 

पुन्हा मी तेच सांगतोय असं वाटेल पण खरोखरचं साहिर ने हे गाणं इतकं आतून काढून लिहिलंय आणि अशक्य सुंदर लिहिलंय. इतकी वेदना मी कधीच कुठलं गाणं ऐकताना अनुभवलेली नाही. ह्यात बर्मन साहेबांना, रफी साहेबांना आणि हा चित्रपट बनवणाऱ्या आणि त्यात कामही करणाऱ्या गुरू दत्त ला तर माझं नमन आहेच पण ह्या साहिर चं काय करायचं मला अजून कळलेलं नाही. तो जेव्हा लिहितो ते आपल्या च मनातलं तो सांगतोय असंच नेहमी वाटतं आणि म्हणून च तो इतका महान आहे.

आता हे पूर्ण गाणं तर इथे देणं शक्य नाही पण २-३ ओळी दिल्याशिवाय मला राहवणार नाही म्हणून देतो-

या जगात प्रत्येकाला काही ना काही त्रास, दुःख असतंच आणि आपण उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला हेच दिसेल, साहिर नि लिहिलंय-

हर एक ज़िस्म घायल, हर एक रूह प्यासी
निगाहों में उलझन, दिलों में उदासी 
ये दुनिया है या आलम-ए-बदहवासी

भीषण नैसर्गिक आपत्ती किंवा आतंकवादी हल्ले किंवा काहीही कारणांनी जेंव्हा सहज माणसं आपला जीव गमावतात किंवा एकमेकांचा जीव घेतात किंवा आपल्या जवळच्या लोकांना फसवतात ना तेव्हा मला तरी नेहमी असा प्रश्न पडतो की माणसाच्या अस्तित्वाला खरंच काही अर्थ आहे का सगळा कठपुतळीचा खेळ आहे. त्याविषयी साहिरने इतकं चपखल लिहिलंय-

जहाँ एक खिलौना है इंसान की हस्ती 
ये बस्ती है मुर्दा परस्तों की बस्ती 
यहाँ पर तो जीवन से है मौत सस्ती 

ये दुनिया जहाँ आदमी कुछ नहीं है 
वफ़ा कुछ नहीं, दोस्ती कुछ नहीं 
यहाँ प्यार की क़द्र ही कुछ नहीं है 

ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है!

आता एवढं सगळं वाचून तुम्हाला असं वाटेल की हा माणूस नेहमी जीवन तत्वज्ञान, शोकांतिका आणि भीषण सत्यच लिहितो का? हा काही रोमँटिक लव्ह सॉंग्स वगैरे लिहितो का नाही ?

तर त्याचं उत्तर असं आहे की नक्कीच लिहितो आणि खूप उच्च दर्जाचं लिहून जातो!

मी आत्तापर्यंत ऐकलेल्या रोमँटिक/लव्ह सॉंग्स पैकी सगळ्यात आवडलेली २ गाणी म्हणजे-

पहिलं राजा मेहदी अली खान नी लिहिलेलं, मदन मोहन साहेबांचं संगीत असलेलं आणि  लता मंगेशकर नी गायलेलं   'लग जा गले.. ' .
दुसरं साहिर नी लिहिलेलं, जयदेव साहेबांचं संगीत आणि रफी-आशा नी गायलेलं  'अभी न जाओ छोड़कर.. '.

इतकं डीप रोमँटिक आणि आर्त-तरल मी दुसरं काहीही ऐकलेलं नाही. अर्थात ती गाणी ज्यांनी संगीत बद्ध केली आणि गायली त्यांना क्रेडिट आहेच पण ज्यांनी लिहिलं त्यांची किती कमाल आहे.

साहिर नी लिहिलेलं अजून एक सुंदर रोमँटिक गाणं आहे, मुकेश नी गायलंय पण मस्तंच!

तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं 
तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी 

आता ही जलन सगळ्यांनीच कधी ना कधी अनुभवलेली असते, पण ती बरोबर शब्दात पकडणारा साहिर एक असतो.

दुसरं  एक गाणं गाणं आहे-

प्यार पर बस तो नहीं है मेरा, लेकिन फिर भी 
तू बता दे के तुझे प्यार करू या ना करू 

समोरच्या च्या मनात नक्की काय चाललंय याचा अंदाज घेत घाबरत आपल्या मनातलं सांगण्याची धडपड याहून सोप्या शब्दात मांडता येईल का ?

साहिर चं अजून एक वेगळ्या मूड चं गाणं आहे, खरंतर ती आधी कविता होती आणि नंतर ते सिनेमा त गाणं म्हणून घेण्यात आलं.

'चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनों ' 

या गाण्यातली माझी सगळ्यात आवडती ओळ आहे-

वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन 
उसे एक खूबसूरत मोड़ दे कर छोड़ना अच्छा 

खरच लिहावं तितकं कमीच आहे. त्यामुळे आता  वेगवेगळ्या मूड्स ची काही गाणी फक्त लिस्ट करतो त्यांचे लिरिक्स सांगत बसत नाही, पण तीही जरूर ऐकावी अशीच आहेत.

'कभी कभी मेरे दिल में ख़याल आता है',

'मन रे तू काहे ना धीर धरे?',

'कभी खुद पे कभी हालात पे रोना आया'',

'तुम अगर साथ देने का वादा करो'',

'ज्याने क्या तूने कहीं'',

'ना तो कारवां की तलाश है'',

'ए मेरी ज़ोहरजबीं' ',

 'साथी हाथ बढ़ाना '

'तुमसा नहीं देखा' 


'वादा करो नहीं छोड़ोगी तुम मेरा साथ'

'लागा चुनरी में दाग'

'ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं'

'निगाहें मिलाने को जी चाहता है'

'तेरे चेहरे से नज़र नहीं हटती'

'दुखी मन मेरे सुन मेरा कहना'

'जीवन के सफ़र में राही'


'किसी पत्थर की मूरत से मुहब्बत का इरादा है'

जाता जाता शेवटचं एक गाणं  सांगतो, कारण ते गाणं साहिरला डिफाईन करतं असं मला वाटतं.
इतकं सगळं लिहून सुद्धा नम्रपणे तो म्हणतो-

मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है
पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है

मुझसे पहले कितने शायर, आए और आकर चले गए,
कुछ आहें भरकर लौट गए, कुछ नग़मे गाकर चले गए

वो भी एक पल का किस्सा थे, मै भी एक पल का किस्सा हूँ
कल तुमसे जुदा हो जाऊँगा, जो आज तुम्हारा हिस्सा हूँ

कल और आएंगे नग़मों की खिलती कलियाँ चुनने वाले
मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले

कल कोई मुझको याद करे, क्यूँ कोई मुझको याद करे
मसरूफ़ ज़माना मेरे लिये, क्यूँ वक़्त अपना बरबाद करे


मैं पल दो पल का शायर हूँ ... 

- ओंकार करंदीकर ©

Saturday, September 28, 2019

किशोर कुमार आणि 'सॅड सॉंग्स' - ओंकार करंदीकर

किशोर कुमार आणि 'सॅड सॉंग्स' - ओंकार करंदीकर




           आभास कुमार गांगुली म्हणजे अर्थातच द ग्रेट जिनियस  'किशोर कुमार' हे एक प्रचंड मस्तीखोर ,खट्याळ, विक्षिप्त आणि तरीही  supremely talented आणि all rounder व्यक्तिमत्व होतं हे काही मी नव्याने सांगायला नकोच. या लेखात मी फक्त त्याच्या (एकेरी उल्लेख प्रेमापोटी ... जसं लता, आशा, रफी, मुकेश आपले तसा चं किशोर .. थोडा जास्तंच आपला वाटणारा )  गाण्यांविषयी बोलणार आहे आणि ते ही सॅड सॉंग्स  विषयी! 

            किशोर कुमार ची गाणी हा एक प्रचंड मौल्यवान असा ठेवा आहे. आपला मूड कसा ही असो त्याला सूट होणारं किंवा तो सुधारणारं किशोर चं गाणं असतंच. त्याची रोमँटिक, लटका राग दाखवणारी , नखरेल आणि यॉडलिंग असलेली अशी गाणी काही कमी नाहीत आणि ती ही ग्रेट चं आहेत. उदाहरणार्थ 'छोड़ दो आंचल ज़माना क्या कहेगा', 'पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले' ही देव साहेबांवर चित्रित झालेली (गाताना किशोर ने जी मस्ती गाण्यात आणलीये त्याचा पडद्यावर देव आनंद ने केलेल्या मस्ती मध्ये मोठा वाटा आहे) गाणी , किशोर आणि मधुबाला ची 'हाल कैसा है जनाब का' सारखी आशा सोबतची डुएटस किंवा  'मेरे सपनो की रानी कब आएगी तू ', 'पल पल दिल के पास तुम रहती हो' , 'रात कली एक ख़्वाब में आयी' ... ही आणि अशी अनेक रोमांटिक, काही  प्रचंड एनर्जी नी गायलेली, काही लयीशी खेळत गायलेली, काही अतिशय सॉफ्टली गायलेली गाणीही माझी आवडती आहेतच, पण ज्या गाण्यांसाठी मी किशोरदांचा मोठा चाहता आहे ती ही नव्हेत. ती आहेत त्याची धीर-गंभीर आणि पडद्यावर विमनस्क अवस्थेतल्या नायकावर ( बहुतांश वेळा राजेश खन्ना) चित्रित झालेली. इथे ही राजेश खन्ना ला मुद्दाम वेगळा अभिनय करावाच लागला नसेल इतकी किशोर ने गायलेली गाणी खोल परिणाम करणारी आणि भावनापूर्ण आहेत.

          रफी आणि  मुकेश ची गंभीर सॅड गाणी ही खूप सुंदर आणि परिणामकारक आहेतच आणि इथे कुठलीही तुलना करण्याचा हेतू नाही पण तरीही किशोर कुमार नी जेव्हा अशी गाणी गायली तेव्हा ती वेगळयाच लेव्हल ला तो घेऊन गेला आणि त्याचा परिणाम कित्येक पटीने जास्त झाला असं मला वाटतं..  निदान माझ्यावर तरी. त्याची शब्दफेक, त्याची इंटेन्सिटी, आवाजाच्या व्हायब्रेशनचा, ग्रेस नोट्स चा  सहज पण कमाल वापर आणि हे सगळं कुठलंही औपचारिक शिक्षण न घेता केवळ आपली आवड जोपासत स्वतःच्या मेहनतीने!


          किशोर कुमार नी सलिल चौधरी , हेमंत कुमार यांसारख्या अनेक मोठ्या संगीतकारां साठी गाणी गायली, पण बर्मन दादां (एस डी बर्मन ) सारख्या बुजुर्ग संगीतकारानी आणि नंतर त्यांच्या जिनियस पुत्रानी (आर डी बर्मन ) खऱ्या अर्थानी किशोर कुमार ला एक टॉप चा प्लेबॅक सिंगर बनवलं (बनवलं म्हणजे तो हिरा होताच, ह्यांनी त्याला पैलू पाडले किंवा त्याचा टॅलेंटचा  मॅक्सिमम वापर केला असं आपण म्हणू ). 

          'अमर प्रेम' (आनंद बक्षी- आर डी बर्मन- किशोर कुमार हे त्रिकुट कमाल होतं आणि अर्थात च पडद्यावर राजेश खन्ना ) मधली 'कुछ तो लोग कहेंगे' आणि 'चिंगारी कोई भड़के' ही दोन गाणी जरी फक्त किशोर गायला असता आणि बाकी काही गायला नसता तरीही तो तितका च महान असता, पण आपलं भाग्य की तो तेवढं चं नाही गायला. त्यानी लता-आशा-रफी सारखी १०-२० हजार गाणी गायिलेली नाहीत (कारण सुरवातीचा खूप मोठा काळ तो फक्त देव आनंद किंवा स्वतः साठी च गात होता ) पण तरीही जी गायली आणि त्यातली माझी काही अतिशय प्रिय गाणी इथे नमूद करतो ( हे मला किती माहित आहे हे सांगण्यासाठी नव्हे तर वाचकांपैकी ज्यांनी कोणी ती नसतील ऐकली तर जरूर ऐकून त्याच्या प्रेमात पडावं म्हणून).

           त्याचं अगदी सुरवातीचं 'दुखी मन मेरे' आणि त्या नंतर (कुठल्याही क्रमाने नाही, जशी आठवतील तशी नावं देतोय) , 'ज़िन्दगी के सफर में गुजर जाते हैं', 'मेरे नैना सावन भादो', 'दिल आज शायर है', 'मेरी भीगी भीगी सी' , 'मेरे मेहबूब क़यामत होगी' , 'वह शाम कुछ अजीब थी', 'दिल ऐसा किसीने मेरा तोडा' (ह्यातला तोडा हा शब्द किशोर कुमार ने जसा उच्चारलाय तसा संपूर्ण विश्वात कोणी उच्चारू शकणार नाही आणि ही अतिशयोक्ती नाही ), 'इस मोड से जाते है', 'मुसाफिर हूँ यारो' , 'बेक़रार दिल', 'तेरी दुनिया से होके मजबूर चला', 'घुँघरू की तरह बजता ही रहा हूँ मैं ',  'कोई होता जिसको अपना', 'तुम बिन जाऊ कहा' (हे च गाणं रफी ने ही गायलेलं आहे वेगळ्या स्टाईल नी) आणि शेवटी सबकुछ किशोर कुमार असलेलं 'आ चल के तुझे' हे गाणं . ही सगळी गाणी एक एक जीव ओवाळून टाकावा अशी गायलेली आहेत. अर्थात त्या गाण्यांच्या गीतकार आणि संगीतकार ह्यांना ही ते क्रेडिट जातंच पण ते स्वतःही मान्य करतील की ही च गाणी किशोर ऐवजी दुसरा कोणी गायला असता तर इतकी अप्रतिम झालीच असती असं नाही. अजून एक गाणं आहे पण ते फक्त ऐकायचं, बघायला जाऊ नका कारण खूप भ्रमनिरास होईल ते गाणं म्हणजे 'चलते चलते मेरे ये गीत याद रखना' (काही वेळा सुंदर गाण्यांची पडद्यावर वाट लावण्याचं काम ही पूर्वी झालेलं आहे याचं हे उत्तम उदाहरण).  


          कित्येकदा माणूस आपल्याला जसा बाहेरून दिसतो किंवा आहे असं दाखवतो तसा तो असतो असं नाही. सुरवातीला म्हंटल्या प्रमाणे प्रचंड खट्याळ, विक्षिप्त, रोमँटिक असं बाहेरून वाटणारं किशोर कुमार चं व्यक्तिमत्व असलं तरी आत खोलवर कुठेतरी तो खूप दुखावलेला असावा, सुरवातीच्या  स्ट्रगल च्या काळात त्याला इंडस्ट्री मधल्या काही लोकांनी ज्या प्रकारे वागवलं ( आणि तेच लोकं नंतर च्या काळात  त्याच्या दारात लोळण घेत होते) त्यामुळे आणि त्याच्या वैयिक्तक आयुष्यात ही त्याला जे अनुभव येत राहिले त्यामुळे असेल कदाचित पण ही सगळी वेदना त्याच्या सॅड सॉंग्स मध्ये दिसते. खोटा खोटा भाव आणून कोणी इतकं सुंदर परिणामकारक  गाऊ शकत नाही.

           किशोर कुमार च्या जन्माला ९० वर्ष होऊन गेली आणि तो या जगातून निघून जाऊन ही ३३ वर्ष झाली आणि तरीही माझ्या सारख्या पंचविशीतल्या तरुणाला त्याच्या गाण्यांनी इतकं प्रभावित करावं हा त्याच्या आणि एकूणच बॉलीवूड संगीताच्या 'गोल्डन एरा'तल्या गाण्यांचा कालातीत असल्याचा पुरावा आहे. माझ्या पिढीच्या फार कमी लोकांना जुनी गाणी आवडत असतील  (आणि असं नसेल तर मला आनंदच आहे) ते हा लेख वाचून रिलेट करू शकतीलच आणि जे नसतील ऐकत त्यांनी हा लेख वाचून जुनी गाणी ऐकायला सुरवात करायचं ठरवलं तर 'किशोर कुमार' सॉंग्स इज नॉट ऍट ऑल अ बॅड वे टू स्टार्ट विथ !! 
ओंकार करंदीकर 


Thursday, September 4, 2014

चित्रकला !! (…. .???)हस्तकला!! (……??) - ओंकार करंदीकर .

चित्रकला !! (…. .???)हस्तकला!! (……??) 
           
        'एखाद्या माणसाची आणि आपली wavelegth का जमावी आणि एखाद्याची का जमू नये ह्याला काही उत्तर नाही' असं  पु.ल. देशपांडे जे म्हणतात ना  ते मला फक्त माणसांपुरतं मर्यादित आहे असं वाटत नाही. अनेक गोष्टींशी आपलं जुळतं आणि अनेक गोष्टींशी जुळत नाही , का ते मात्र कळत नाही!
         तसंच म्हणायचं तर माझी शब्दांशी wavelength जुळली. सूर-लय-ताल वगैरे लोकांशी एकतर्फी प्रेम जुळलं (ज्याला आपण बाथरूम सिंगिंग म्हणतो न ते!) पण रंग-रेषा नी मला कधीच दाद लागू दिली नाही. खरतर माझे काका आजोबा प्रख्यात चित्रकार होते ! आणि बहिणीला सुद्धा या चित्रकलेची वगैरे फार आवड आहे.आई सांगते की ती शाळेत असताना तिची चित्रं काचफलकावर वगैरे लावत! ( तिचं नावच 'चित्रा' आहे ! हा भाग अजूनच निराळा) ,बाबा सुद्धा मला
लहानपणी 'सरस्वती' चे चित्र(अर्थात दसरा असेल तेव्हा) काढून देत ,किवा काही sketches वगरे पण काढू शकतात! इतकंच कशाला  माझी  जन्म तारीख आणी प्रसिद्ध चित्रकार  एम .एफ. हुसैन यांची जन्म तारीख एकच आहे . 
          असं सगळं नीट जुळून आलेलं असताना माझी पाटी त्याबाबतीत कोरीच राहिली.एकदा चौथी का पाचवीत असताना माझ्या काका आजोबांकडे चित्रकला शिकायला गेलो होतो… अर्थात मला त्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता पण माझी बहिण जायची म्हणून मी पण थोडे दिवस गेलो … तिथे त्यांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी अगदी मन लावून चित्रे घोटीत असत आणि लोकांची चित्रे काढून  रंगवून झाली तरी मी आपला काहीतरी सुरवात कशी करावी वगरे विचारात . 
तर एकदा झालं काय आजोबांनी मला त्यांच्या त्या कुंचले बुडवायच्या ग्लास मधलं पाणी बदलून आणायला सांगितलं. 
तेव्हाच माझ्या तेव्हा बाल असलेल्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती …. कारण ते पाणी घेऊन जाऊन नवीन पाणी न सांडता घेऊन येणं हे माझ्या दृष्टीने गंगा घेऊन येण्यासारखच कठीण होतं.  पण का माहित नाही सुदैवाने ते मी न सांडता घेऊन आलो आणि भलताच खुश होतो पण आजोबांचा चेहरा लालबुंद झालेला … मला कळेना नक्की प्रोब्लेम काय आहे ?… तर प्रोब्लेम असा झाला होता कि तो हातामधला ग्लास पूर्ण एकाग्रचित्ताने घेऊन येण्याच्या नादात मी पायाने; दुसरा एक खाली ठेवलेला ग्लास उडवला होता आणि त्यातल्या जलाचा एका पूर्ण झालेल्या चित्रावर अभिषेक झाला होता आणि ह्या अभिषेकाने मला कुठलही पुण्य लाभलं नाही हे वेगळं सांगायला नकोच… तिथून मी जी धूम ठोकली ती पुन्हा न परतण्यासाठीच. 
           पण भित्याच्या पाठच्या ब्राम्हराक्षासाप्रमाणे माझी पाठ चित्रकलेने ९वी पर्यंत सोडली नाही. मला मराठी, गणित समाजशास्त्र वगैरे विषयांचे पेपर्स देताना कधी इतकी भीती वाटली नाही… ती सगळी कसर चित्रकला भरून काढे . 
आमच्या शाळेत ह्या चित्रकला विषयाचे गुण धरत ,त्यामुळे कारण नसताना माझ्या वार्षिक प्रगती (????)पुस्तकातले टक्के कमी होत आणि माझा नंबर जाई. मी शाळेत फक्त दोन वेळा सुटकेचा निश्वास टाकला १ म्हणजे सातवीत हिंदी संपलं तेव्हा आणि २ म्हणजे नववी मध्ये चित्रकला सरली तेव्हा. महत्वाच्या दहावीला चित्रकाम नाही हे पाहून मी प्रचंड खुश झालो. (कित्येक लोकांचे चेहरे इथे पडले असतील माझी अरसिकता पाहून, पण त्याचे मला मुळीच काही वाटत नाही) . 
          अहो हे काम भलतंच अवघड हो! मी आपला एक ठरलेलं निसर्ग चित्र काढून गप्प बसायचो . त्यात सुद्धा विषय काहीही असुदे आपले वरती त्रिकोणी डोंगर त्यातून डोकावणारं सुर्यबिंब ( अर्थात पावसात खेळणारी मुले असा विषय असेल तर त्याला वजा करावा लागे आणि पाऊस दाखवावा लागे )मग दोन तीन पक्षी (२-३ लघुकोन करणाऱ्या रेषा) खाली एक भलं मोठं झाड (कागद संपवायचा हे एकच उद्दिष्ट!) आणि मग उरेल त्या जागेत विषयानुसार माणसे, तीदेखील पाठमोरी कारण तोंडावरचे भाव दाखवणं माझ्या कुंचल्याला बापजन्मात शक्य झालं नसतं . तर हे असं चित्र काढून सुटका नाही खडू किंवा water colors नी रंग भरायचे … थोडक्यात काढलेल्या चित्राची अजून वाट लावायची …हे सगळे द्राविडी प्राणायाम करून जर चित्र रंगवून झालंच तर त्यात कधी हातच पडे ,कधी कुंचला पडे ,कधी कधी तर चित्र वाळतच नसे मग मी बेंच वर उभा राही आणि डोक्यावर चित्राचा कागद धरून पंख्याखाली (तो सुरु असला तर !) धरे !
कारण ते सुकलं नाही तर सगळ्यांचे पेपर्स गोळा करून एकावर एक ठेवले कि आपल्या सोबत दुसऱ्याचही चित्र खराब होण्याची भीती. (माझं चित्र खराब आधीच असे ! त्यामुळे अजून फार खराब होऊ शकत नसे ती गोष्ट निराळी). 
        या  सगळ्या धामधुमीत एक चित्रकलेचा प्रकार त्यातल्या त्यात दिलासादायक होता तो म्हणजे 'मुक्तहस्तचित्र' हे त्याच्याशी माझी थोडीशी गट्टी जमू शकली कारण एका वर्तुळात किवा चौरसात अजून छोटे छोटे भौमितिक आकार काढून मग त्यात नागमोड्या रेषा वगैरे काढून त्यात रंग भरायला मला मजा वाटे ! … कारण इथे कसलच बंधन नसे , 
रंग बाहेर गेला म्हणून बिघडत नसे ! (या चित्राच्या बळावर मी चित्रकलेत पास होत असे ) त्याचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत . 
           चित्रकला,हस्तकला,कार्यानुभव  हे असले नाजूकपणे करण्याचे विषय आपल्याला कधी जमलेच नाहीत.
अर्थात चित्रकले प्रमाणे ह्या इतर लोकांनी फार वर्ष त्रास दिला नाही, म्हणजे इंग्रजांच्या राजवटीपुढे फ्रेंच-पोर्तुगीज यांचा जाच कमी वाटावा तशातली बाब . कागदाच्या घड्या घालून प्राणी वगैरे बनवणं किंवा लोकरीच्या वगैरे पिशव्या बनवणं हे प्रकार  कंटाळवाणेच असत ! ( बहुतेकदा वर्गात कसातरी वेळ काढून ,घरी आई ,आजी किंवा मोठी बहिण यांना मी कामाला लावे ,त्या सुद्धा आनंदाने करत ) एकदा ५ वी मध्ये असताना सुई मध्ये दोरा ओवायला जमेना… मी गेलो 
शिवणाच्या बाईंकडे माझं गाऱ्हाणं घेऊन … तर त्यांनी अस्खलित मराठी मध्ये 'मी तुझी व्यक्तिगत नोकर नाही ' असं म्हणून मला हाकलून लावलं (बाईंच  माहेर पुणे असावं …) मी तेव्हाचं ठरवलं ह्या बाईंची चांगली जिरवायची … मी घरी आलो तर आत्या आलेली होती  कदाचित श्रावण असेल आणि सवाष्ण म्हणून जेवायला…. मी रागातच घरी आलो आणि समोर आत्या दिसल्यावर माझे डोळे लकाकले ( माझ्या दोन्ही आत्या शिवणकाम,भरतकामात पटाईत आहेत ) मी त्या क्षणी जेवायलाही न बसता आत्या कडून सुई ओवायला शिकून घेतलं आणि लगेच लोकरीची सुई देखील ! आणी त्यावर साखळी कशी घालायची याचं ज्ञान घेतलं … त्यानंतर २ वर्षांनी त्याच बाई आम्हाला ७ वी मध्ये पुन्हा आल्या कार्यानुभावाला … त्या दिसल्या दिसल्या मी गपचूप दप्तरामधून लोकरीचा गुंडा आणि ती सुई काढली….आणि त्या काय बोलतायत वगैरे क्षुल्लक बाबींकडे लक्ष न देत लांबच लांब साखळी करायला सुरवात केली … शेवटी तास संपत आला तेव्हा खाली जमिनीला लोळेल इतकी लांब निरर्थक साखळी मी विणली … शेवटी त्यांनी मला पुढे बोलावलं आणि सगळ्या वर्गासमोर समोर त्यांनी मला विचारलं की तुझं काय सुरु आहे ते आम्हाला कळू शकेल का ?  ंमी म्हंटल काही  नाही हो स्वतःच स्वतः ची सुई ओवता आल्याच्या अत्यानंदाने हे कृत्य करतोय … त्या मनातल्या मनात जे समजायचं ते  समजल्या आणि मला शाबासकी देऊन म्हणल्या बघा पोरानो अशी जिद्द हवी ! मला मस्तपैकी आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. 
         तर सांगायचा मुद्दा असा की मी ठरवलं तर थोडसं हस्तकलेच्या कामात मदत करू शकतो ,उदाहरणार्थ घरगुती शिकवणीला जायचो तिथे आकाशकंदील ,पणत्या वगैरेंसाठी मदत केली तेवढीच ! पण तो माझा पिंड नाही … 
महत्प्रयासाने थोडंसं जमतं. पण हे सगळं ज्या मनुष्यांना जमतं न त्यांच्या विषयी मला अतीव आदर आहे. मला कुठे चांगली चित्र, शिल्पं वगरे दिसली कि मी त्यांच्याकडे आदरपूर्वक वगैरे पाहतो आणि त्यांच्या सौंदर्याचं कौतुक देखील करतो पण कोऱ्या नजरेने कारण त्यातून फारसा आनंद मला घेत येत नाही . engineering colleges मध्ये ज्याप्रमाणे पहिले assignments कोण लिहितो हे कळत नाही ना त्याप्रमाणे ही चित्रं कुठून सुरु होतात किवा करायची हे मला उमगत नाही . तेच एखादी सुंदर कविता वाचली किंवा एखादं सुंदर गाणं ऐकलं की माझे डोळे लकाकतात आणि शब्दांत वर्णन न करता येणारा आनंद मला मिळतो आणि मग दिवसभर तेच मनात आणि ओठांत घोळत असतं ,हे असं कधी चित्रांच्या बाबतीत मी अनुभवलं नाही. 
शाळेत मराठी हा विषय मला खूप आवडे आणि ८-९ वी पासून कवितांचा अर्थदेखील हळू हळू कळू लागला . 
शालेय काळात १० वी पर्यंत तबला शिकल्यामुळे असेल कदाचित पण संगीत ऐकायला आवडू लागलं . (१० वी नंतर विज्ञान शाखा निवडली आणि तबला सोडला ह्याचं मला आज वाईट वाटतं आणि १२ वी नंतर मराठी भाषेचा अभ्यास संपला याचंही तितकंच वाईट वाटतं ). 
          आज मागे वळून पाहताना आपल्याला चित्रकला कधी जमली नाही याचं दुखं मुळीच नाही,उलट ते शाळेतले, घरून चित्र ट्रेस करून नेउन तिथे छापल्याचे दिवस आठवून हसायला मात्र येतं.  काही गोष्टी आपल्यासाठी नसतात . आपल्याला थोडंफार लिहायला जमतंय न त्यामध्ये मी खुश आहे .त्यातून मला अपार आनंद मिळतोय . 
पण ह्याला एक अपवाद आहे , एखादी कविता किवा गोष्ट आणि त्यातला अर्थ प्रतीत करण्यासाठी म्हणून काढलेलं चित्र मात्र मला खूप आवडतं आणि भावतं कारण  त्यामुळे मूळ कवितेचा -गोष्टीचा आनंद द्विगुणीत होतो. 
      'स्पृहा जोशी' यांच्या 'लोपामुद्रा' या अप्रतिम काव्य संग्रहामध्ये 'सुमीत पाटील' ह्यांनी स्पृहाच्या प्रत्येक कवितेचा भाव दाखवणारं आणि कवितेच्या अर्थाला अजून गहिरेपणा प्राप्त करून देणारं अलौकिक चित्र काढण्याची किमया साधली आहे ,त्यांनी प्रस्तावनेत लिहिल्या प्रमाणे ही चित्र कुठही कवितेच्या पेक्षा वरचढ न ठरता उलट प्रत्येक रेषेतून कवितेचं 
सौंदर्य अजून वाढवतात. त्याच प्रमाणे पु .लं च्या 'अपूर्वाई' ह्या प्रवासवर्णनमध्ये त्यांच्या विनोद्बुधीला चित्ररूप देण्याची किमया चित्रकाराने साधली आहे ,ही अशी चित्रे असतील तर मग मात्र आपण खुश असतो .


           'लिओनार्डो  द विन्ची' यांचं  एक अप्रतिम विधान आहे ते मला खूप आवडतं …  
' Painting is a poetry that can be seen rather than felt and poetry is a painting that can be felt rather than seen '.
(बाकी या पलीकडे  माझा आणि चित्रकार  'विन्ची' साहेबांचा काहीही संबंध नाही  ) … 
                     - ओंकार करंदीकर . 

Tuesday, August 5, 2014

पुन्हा एकदा भेटलेला 'बोक्या सातबंडे' … ओंकार करंदीकर.

           पुन्हा एकदा भेटलेला 'बोक्या सातबंडे' … 

            मागच्या आठवड्यात मावशीकडे गेलो होतो ,तेव्हा सहज कंटाळ घालवायला म्हणून माझ्या मावसभावाचा कॉम्पुटर लावला आणि त्यातल्या movies चा folder उघडून जरा mood फ्रेश करेल असा सिनेमा हुडकत होतो,लिस्ट मधल्या एका नावावर नजर स्थिरावली -'बोक्या सातबंडे' . खरं  सांगतो माझ्या लहानपणच्या या पुस्तकांतून भेटलेल्या सवंगड्याच्या जीवनावर पुढे कधी एक सिनेमा बनवला जाईल असं कधी वाटलचं नव्हतं. 
            श्री.'दिलीप प्रभावळकर' यांच्या लेखणीतून निर्माण झालेलं हे काल्पनिक पात्र पुन्हा एकदा खूप वर्षांनी मी बघत होतो आणि या वेळी मला imagination करावं लागत नव्हतं कारण ते पात्र प्रत्येक्ष स्क्रीन वर नाचत होतं.हा सिनेमा मला खूप आवडला याचं कारण १०-१२ वर्षांपूर्वी बोक्याची पुस्तकं वाचताना डोळ्यासमोर कल्पनेनी उभी केलेली ही सगळी पात्रं -स्वतः बोक्या,विजू दादा, बोक्याचे आई-वडील,आजी, त्याचे मित्रं आणि ह्या सिनेमातली पात्रं ही एकमेकांशी तंतोतंत जुळणारी वाटली मला. 
             अर्थात या सिनेमासाठी थोडा वेगळा Screenplay असणं साहजिक आहे. मी हा चित्रपट एखाद्या लहान मुलासारखा खुर्चीला खिळून राहून पाहिला आणि त्यातले बोक्याच्या चलाखपणाचे,त्याला बालवयातसुद्धा समजलेल्या माणुसकीचे,निरागसपणे इतरांना मदत करण्याचे प्रसंग एकामागून एक पाहत होतो आणि जेव्हा चित्रपट संपला तेव्हा मला जाणिव झाली की आपले डोळे नकळत पाणावलेले आहेत. 
              नाही! मी एवढ्याश्या तेवढ्याश्या कारणांनी हळवा होणारा माणूस नाही …. मग विचार केला हे डोळ्यात दाटलेलं पाणी किमर्थम? उत्तर मिळालं ना …. ते असं की बोक्याच्या रुपात कित्येक वर्षांनी हरवलेलं निरागस बालपण मला पुन्हा गवसलं होतं आणि त्यामुळे मिळालेलं satisfaction डोळ्यांत दाटलेल्या पाण्यातून प्रतीत होत होतं.हळूहळू नजर शून्यात स्थिरावली आणि एकामागून एक लहानपणचे पुस्तकांमधून भेटणारे सर्व सवंगडी -फास्टर फेणे,शेर्लोक होम्स आणि TV मधून भेटणारे Pokemons,Beyblades,Tom & Jerry, Swat Cats भोवती पिंगा घालू लागले;काही क्षणांसाठी का होईना मी  पुन्हा त्या निरागस विश्वात मश्गुल झालो. तिथे आत्ताचे झोप उडवणारे आणि सतत उत्तरं   मागणारे प्रश्न नव्हते. 
              पण आदल्याच  दिवशी लागलेल्या engineeing result ची चौकशी करणारा … खरंतरं कान उखाडणी करणारा आमच्या मातोश्रींचा call आला आणि माझी समाधी भंग पावली. मी यावेळी आईवर न चिडता (नेहमीप्रमाणे) शांतपणे सगळं ऐकून घेतलं (कदाचित बोक्याचा परिणाम असेल) अर्थात काही बिनबुडाची वाटणारी कारणं ही दिलीच … बचावाप्रित्यर्थ ! तर मुद्दा असा की मी वास्तवात परतलो आणि आठवलं की आता माझा पुस्तकांचा आणि सिनेमांचा choice बाळबोध नाहीये,आता pokemon ची जागा football ने आणि 'फास्टर फेणे' ची जागा 'चेतन भगत' च्या novels नी घेतली आहे. 
             पण त्याच वेळी एक गोष्ट मनात ठरवून टाकली की ह्यापुढे काही होउदे ! खूप वर्षांनी मला माझ्यातलं गवसलेलं हे लहान मूल जपायचं! आणि नकळत तोंडी 'क्यूंकी तुम ही हो' हे न येता 'असावा सुंदर चोकलेट चा बंगला' हे मी गुणगुणू लागलो आणि माझचं मला हसू आलं ,भावाने विचारलं का हसतोयस? तर काहीनाही एक Non-Veg जोक SMS  वर वाचला म्हणून हसतोय अशी थाप मारली आणि बाजूला झालो! … 
                                      -ओंकार करंदीकर. 
     

Thursday, July 31, 2014

'ट्रेन' विषयीच्या गमती-जमती. -ओंकार करंदीकर

'ट्रेन' विषयीच्या गमती-जमती.

      लोकल ट्रेन्स म्हणजे मुंबईकरांचा एकदम जिव्हाळ्याचा विषय(ईलाज नाही !!)खरतर Driving Force च म्हणा ना! लोकल्स थांबल्या की जणू जीवन ठप्प होतं. त्यासोबत अनेक गमतीशीर अनुभव येतात ,खुमासदार किस्से ऐकायला मिळतात.
       मी लहान होतो न तेव्हा मला वाटायचं की स्लो लोकल म्हणजे तिचा स्पीड कमी आणि फास्ट लोकल म्हणजे तिचा स्पीड जास्त. नंतर सत्य कळलं तेव्हा गम्मत आणि राग असं mixed feeling आलं ( गम्मत सत्यामुळे आणि राग स्वत:च्या मुर्खपणामुळे ) म्हणे सगळीकडे थांबते म्हणून स्लो लोकल आणि काही ठराविक महत्वाच्या स्थानकांवर थांबते म्हणून ती फास्ट!!(ही काय फालतुगिरी!).
       अजून एक गोष्ट जी सगळे मान्य करतील … लोकल ट्रेन मध्ये कितीही लोक मावू शकतात,म्हणजे साधारण डोंबिवली ला आपण गाडीत चढलो तर गाडी जवळ जवळ भरलेलीच असते आणि मग आपण विचार करतो की आता काही फार माणसं अजून मावणार नाहीत… पण छे!! मला इथे शाळेत शिकलेला भौतिकशास्त्राचा नियम आठवतो की समजा एका ग्लास मध्ये पाणी काठोकाठ भरलं आणि मग एक छोटा बर्फाचा खडा अलगद त्यावर सोडला तरी पाणी बाहेर पडत नाही लगेच कारण बर्फ वितळून ते  पाण्याच्या दोन रेणूंमध्ये असलेल्या जागेत (Intermolecular Space) ते जातं .
     मग गाडी cst असेल नाहीतर कर्जत त्यात लोक भरतच जातात (अर्थात काही लोकं वेगवेळ्या स्टेशन्स वर उतरतात!)म्हणजे एखादी पाणीपुरी खाताना ती काठोकाठ भरावी आणि शेवटी तोंडात घालताना पाणी हनुवटीवर सांडाव न तश्यातला प्रकार झाला( म्हणजे काही लोक लटकत लटकत जातात त्यापैकी काही दुर्दैवाने किंवा मस्तीमुळे पडतात ).
     पावसाळ्यात तर बघायलाच नको! मुळात आधी ट्रेन नेहमीच वेळेवर येतात असं नाही (आपण उशिरा आलो कि आधी येतात :P ) त्यात हा ऋतू म्हणजे त्यांचा हक्काचा…कुठे पाणीच तुंबून राहील तर कुठे Overhead wire पडेल… एक न दोन !! अर्थात college बुडवायला उत्तम निमित्त (exam नसेल तर … नाहीतर गोची होते ).
     हा नन्ना चा पाढा जरी मी वाचत असलो तरी ट्रेन मध्ये Enjoyment पण कमी नसते बरं का!
सगळ्यात जास्त करमणुकीचा विषय म्हणजे ट्रेन मध्ये होणारी बाचाबाची(पु.लं च्या भाषेत  'बा'चा 'बा'ची) आणि शिवीगाळ. आपल्याला बसायला जर जागा मिळाली असेल किंवा व्यवस्थित उभं राहता आलं तर मग असल्या भांडणाचा मनोसक्त आस्वाद घेता येतो!(अर्थात आपलं लक्ष नाही असं दाखवून :P). 
     अजून एक मजेदार गोष्ट आहे जी माझ्या एका मित्राकडून शिकलोय! ती म्हणजे लोकांचे चेहरे आणि एकंदर देहबोली न्याहाळणं. खूप हसू येतं (ते ज्याला हसतोय त्याच्या पासून लपवण्यात पण खूप मोठं Skill असतं)एखादा माणूस पेंगत असतो … पेंगताना बाजूला झोकांड्या देतो ,त्यामुळे बाजूचा माणूस त्रस्त असतो.. तोही मग खोट्या खोट्या झोपेत मुसंड्या मारून अधिच्याचे वार परतवतो! एखादा उगाच विश्वाची चिंता असावी तसा डोक्याला हात लावून बसतो,एखादा  दारात असलेल्या मधल्या बार शी प्रणय क्रीडा करत पाय वाकवून उभा असतो( अर्थात ह्या सगळ्या पोझ मी सुद्धा देत असेन  नकळत! आणी लोक हसत देखील असतील)हे सगळं का तर कंटाळवाणा प्रवास लवकर संम्हणून.
   कधी कधी काय होतं फार धावत धावत ट्रेन पकडावी लागली तर चुकून किवा मुद्दामून अपंगांच्या डब्ब्यात चढावं लागतं. मग काय तिथेही बाचाबाची किंवा हल्ली तर TC च्या लक्षात आलं तर… असो अजून एक वादग्रस्त गोष्ट म्हणजे पुरुष्यांच्या डब्यात स्त्रिया चढतात ते.म्हणजे स्त्रियांच्या डब्यात गर्दी असताना पुरुष्यांच्या  डब्यात चढणं ठीक आहे पण उगीच च्या उगीच पुरुष्यांच्या डब्यात चढणं मला पटत नाही(इथेही पुरुष्यांच्या जागा ढापायच्या!!!). जोक सपाट पण ते स्त्रियांच्याही दृष्टीने फार बरं नाही असं माझं स्पष्ट मत आहे…ते का ते सुजाण  लोकांना(पुरुष आणस्त्रियादोघही!!) कळेलच.        
      माणसांच्या स्वभावांचा अभ्यास करायचा असेल ना तर ट्रेन सारखं दुसरं ठिकाण नाही. नुसतं गप्प बसून किंवा मधेच एखादी फुसकुली सोडून चर्चा ऐकयचं काम करायचं!फार मौज आहे त्यात. तुम्हाला एक उदाहरण देतो.समजा एक ट्रेन दोन स्टेशन्स च्या मध्ये खूप वेळ बंद पडून राहिली ना जे साधारण संवाद सुरु होतात ना ते असे असतात…. एक जण म्हणतो "च्यायला ह्या driver (motorman) ला पण आत्ताच ट्रेन बंद करायची होती का?" ,दुसरा एक म्हणतो " हो ना! ही नेहमीची कटकट आहे " …. तिसरा मात्र असतो मोटरमन चा कैवारी ; तो म्हणतो " सिग्नल नाही तर बिचारा driver काय करणार?"  मग हे पहिले दोघे विरुद्ध तिसरा असं मस्त debate आपल्याला    ऐकायला मिळतं आणि आपण त्यात उत्स्फूर्त सहभाग सुद्धा घेऊ शकतो! काही लोक ह्या वादाचा आस्वाद घेत घेत एकीकडे वर्तमानपत्र वाचायचं ढोंग करतात. ह्या सगळ्याशी काहीच देणं घेणं नसलेले कानाला headphones लावून शांतपणे 'संगीत' आराधना करतात काही वेळा सोबत एखादी 'संगीता' ही असते :p ….हे सगळं सुरु असताना खरा problem काय हे कोणालाच माहित नसतं आणि मग बाजूने दुसरी एक ट्रेन उलट्या दिशेने जाताना दिसते आणि लक्षात येतं की हीच खरी गुन्हेगार !पण लगेच आपलीही ट्रेन सुरु होते आणि त्या आनंदात त्या दुसरया ट्रेन ला थोड्याफार शिव्या देऊन आपण विसरून  जातो!आणि मगाचचा वाद विरून जाऊन सगळे आपापल्या विश्वात रममाण होतात. सध्या  मात्र कोणी काही चुकीचं बोललं कि लगेच 'नया है वह' चे नारे दुमदुमतात.  
        जे लोक रोज ठरलेल्या ट्रेन ने प्रवास करतात ना म्हणजे office वाले आणि विद्यार्थी ,त्यांचे डबे आणि जागा ठरलेल्या असतात,त्यामुळे अपोआप मित्र बनतात,मग entertainment की कोई कमी मेहसूस नही होती. पत्ते,आता smartphone मुळे chain reaction सारखे addictive games ,engineering ला असल्यामुळे submissions च्या काळात शेपटीला आग लागल्याप्रमाणे बाकी राहिलेल्या प्रिय assignments सुद्धा आम्ही ट्रेनमध्ये करतो! Vivas आणि main exam च्या वेळी ट्रेन मध्ये मित्रांसोबत केलेला अभ्यास ही सगळ्यात मजेदार बाब असते.
         अजून एक गमतीदार आणी माझी आवडती गोष्ट म्हणणे ट्रेनमध्ये लावलेल्या अगणित आणी बरयाचदा अगम्य असलेल्या जाहिरातींच वाचन! भाग्य उजळवणार्या तथाकथित अंगठ्यांपासून ते job vacancies आणि ३-BHK flat पासून अध्यात्मापर्यंत वाट्टेल त्या प्रकारच्या जाहिराती असतात. एक तास आपला सहज जातो.
        पण ह्या गोष्टीचा कधी कधी मी दुसरया बाजूने सुद्धा विचार करतो आणी तो असा की तुम्हाला आत्मपरीक्षण करायला ट्रेन हे उत्तम ठिकाण आहे निदान मला तरी तसं नेहमी वाटत आलय. जर आपण एकटे असू तर कधी कधी असाही वाटून जातं की उगाच अनोळखी लोकांच्या तोंडाकडे बघत बसण्यापेक्षा शांतपणे विचार करता येतो. तुम्ही जर
होतकरू कवी-लेखक असाल तर हे कल्पना सुचण्याच्या दृष्टीने महत्वाचं असतं आणि वेळ मिळेल तेव्हा ती कल्पना केवळ कागदावर उमटवणं सोपं जातं. मी अनेक मोठ्या कवी-लेखकांचे असे किस्से ऐकलेले आहेत की त्यांना प्रवासात कल्पना स्फुरतात आणि थोडंफार माझ्याही स्वानुभावावरून!
       खरं सांगू हा लेख जो मी आत्ता लिहितोय त्याचे विचार मी ६-७ महिन्यां पूर्वी चंडीगढ ला जातानाच्या ट्रेन च्या प्रवासात सुरु झालेले होते. खूप दिवस हा कच्चा मजकूर डोक्यात रुंजी घालत होता आणि आज सकाळी ट्रेन मधेच एकटा बसलेलो असताना अचानक त्यातील मुद्द्यांची जुळवा जुळाव सुरु झाली होती आणि आत्ता रात्री दोन वाजता मी ह्या लेखाचं शेवटचं वाक्य लिहितोय!
    आता railway ची सगळ्यात important गोष्ट सांगतो.  Superman -spiderman वगरे आपण म्हणतो पण खरे  superheroes  आपल्या रेल्वेचे मोटरमन आहेत. त्यांचं concentration एका क्षणासाठी जरी lose झालं तरी आपले काय हाल होईल  ह्याची फक्त कल्पनाच केलेली बरी! ( पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा! असं माडगुळकर म्हणले ते खरं आहे!!) कळत-नकळत मी सुद्धा त्यांना त्रासिकपणे शिव्या दिल्याच असतील !त्यांची मनोमन माफी मागून आता थांबतो !

                                                    -ओंकार करंदीकर
         
                                 
     

Tuesday, May 27, 2014

पैशांच्या आणि शब्दांच्या पलीकडले …. -ओंकार करंदीकर

पैशांच्या आणि शब्दांच्या पलीकडले ….

             माणूस जगण्यासाठी पैसे मिळवतो हे जरी खरं असलं तरी पैसे हे माणसाचं सर्वस्व कधीच नसतं. काही गोष्टी अशा असतात ना की ज्यांचं मोल पैशात मांडता येत नाही आणि शब्दात सांगता येत नाही.आपण त्या फक्त जगत असतो .अगदी निस्पृहपणे ! त्यात कोणताही स्वार्थ नसतो, महत्वाकांक्षा नसते.फक्त आणि फक्त निखळ आनंद असतो ,जो सगळ्यात महत्वाचा असतो.काही वेळा दुखं ही असेल ,अश्रू ही असतील पण तेही खरे असतील.केवळ दिखाव्याकरता नव्हे.
              एक उदाहरण द्यायचं झालं तर सचिन,सेहवाग आणि असे अनेक महान खेळाडू आहेत ज्यांची फलंदाजी बघताना असं वाटतं की 'यार इसीलिए तो हम जीते है ना !!!' डोळ्यांचं पारणं फेडणारे अफलातून फटके.किती सांगू ते तरी Cuts,drives ,pulls असे मनात कोरले जातात. मी असा एक एक फटका कितीही वेळा पाहून खुश होऊ शकतो ,express speed ने गोलंदाजी करणाऱ्या ब्रेट ली,शोऐब अख्तर यांना एका bullet drive ने गप्पं करणारा तेंडूलकर शब्दात न सांगता येणारा आनंद देऊन जातो. हीच गोष्ट Football  आणि tennis ची Ronaldo,Rooney यांचे mesmerizing goals, Federer चा artistic slice backhand ,Nadal चा powerfull forehand …. हे सगळं असं असतं खूप क्षणिक पण त्याची आठवण आयुष्यभर आपली सोबत करते. 
सगळ्यात विस्मयकारक गोष्टं अशी की हे सगळं कुठेतरी दूर देशात सुरु असतं. तसं बघायला गेलं तर आपला काहीही संबंध नसतो पण तरीही आपला favourite player किवा team हरली कि आपल्याला त्यांच्या पेक्षा जास्त वाईट वाटतं. इंग्लंड मधल्या एका Manchester United ने मला काय दिलं याची किंमत मी पैशात करूच शकणार नाही… इंडिया क्रिकेट चा सामना जिंकल्यावर जितका आनंद मला होतो न तितकाच आनंद मला Manchester United जिंकली कि होतो. विराट कोहली ची century झाली कि जितकं सुख मिळतं तितकचं सुख रोनाल्डो च्या गोल्स मुळे मिळतं. 
                तीच गोष्टं संगीत,साहित्य-काव्य,सिनेमा-सिरिअल्स  यांच्याविषयी पण, आपल्या अभिजात शास्त्रीय आणि नाट्य संगीता पासून निर्माण होणारं स्वर-विश्वं,दाणेदार ताना,लयकारी हे  जितकं मनाचा ठाव घेतं ,तितकाचं प्रभाव किशोर कुमार,मोहम्मद रफी,आशा भोसले या लोकांच्या अजरामर जुन्या हिंदी गाण्यांनीही पडतो, काही नवी हिंदी गाणी सुद्धा खूप सुंदर असतात,आपली मराठी नवीन गाणीही तितकीच भावतात… यासोबत American Rock Band 'Linkin Park' हे तर माझं आवडतं आहे. 
                तर कमाल अशी कि 'भैरवी' ऐकताना किंवा 'वसंतराव देशपांडे' यांची 'तेजोनिधी लोहगोल','या भवनातील गीत पुराणे' ऐकताना किंवा किशोरदांचं 'पल पल दिल के पास तुम रेहती हो','जब कोई बात बिघड  जाये'  ऎकताना किंवा Linkin park चं 'In The End','In Pieces','Pushing Me Away' ऎकताना मनांत नक्की काय होतं आणि का इतका आनंद मिळतो किंवा का इतकं depress व्हायला होतं हे सांगता येत नाही पण फक्त जाणीव होते ती हि की हे एक वैश्विक सत्य आहे. जगभर माणसाच्या संस्कृतीमध्ये आणि जगण्यामध्ये फरक असला तरी मुलभूत भावना सारख्याच असतात. 
                कुसुमाग्रज,मंगेश पाडगावकर,आरती प्रभू,विंदा  या जुन्या बुजुर्ग कवींच्या प्रेम कविता मला जितकं निखळ सुख देतात ना तितकंच सुखं  मला आजच्या संदीप खरे,सौमित्र,गुरु ठाकूर,स्पृहा जोशी   यांच्या हळुवार कविता सुद्धा देतात. किंबहुना कोणत्याही कवीची-कवयित्री ची चांगली कविता मला भावते … मग एकदा आवडली कि मी समाधान होई पर्यंत ती कविता कितीही वेळा वाचू शकतो,प्रत्येक वेळी नवा नवा अर्थ लागत जातो… हाच तो निखळ आनंद.   
                  एखादा अप्रतिम सिनेमा ,त्यातला एखादा प्रसंग,गाणं अभिनेता-अभिनेत्रींनी त्यांच्या लाजबाब अभिनयाने आणि संवाद-फेकीने कधी रडवणं कधी हसवणं हे सुद्धा तसाच निखळ . 
                पुस्तक-कादंबरी-आत्मचरित्र यांच्या बाबतीत पण तेच … 'श्रीमान योगी,छावा,महानायक'… यांसारखी भारावून टाकणारी ऐतिहासिक पुस्तकं असो किंवा चेतन भगत ची तरुण मुला-मुलीना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली अप्रतिम नोवेल्स असो … किंवा Andre Aagassi ,Wayne Rooney यांसारख्या legendery players ची आत्मचरित्र असो … हि सगळी पुस्तकं …आपल्याला नुसताच आनंद नाही देत तर जगण्यासाठी प्रेरणा देतात ,काहीतरी शिकवत असतात आपल्याला … आणि पुन्हा एकदा हे सगळं पैशांच्या आणि शब्दांच्या तागडीत मोजता न येण्या सारखच आहे. 
                हे सगळं होतं मनोरंजनाबाबत पण त्याहून महत्वाचं काहीतरी असतच आणि ते म्हणजे प्रेम-मैत्री. जिवलग मित्र-मैत्रीणीन सोबत घालवलेले क्षण हा तर आयुष्यभर पुरणारा ठेवा असतो,त्याची आठवण नंतर कधीतरी दूर एकटे असताना आपल्याला होते आणि अश्रू-हास्य यांचं अनोखं मिश्रण चेहऱ्यावर उमटतं . हे सुद्धा अवर्णनीय आणि केवळ स्वतःपुरतं असणारं निखळ सुख . 
                काही अनुभव तर या सगळ्याच्या पलीकडे नेणारे असत्तात… ते जगताना, मनात कोणताही विचार नसतो असा म्हणा चुकीचं ठरेल पण नक्की कोणता विचार असतो हे सांगणंही  कठीण होईल.'मनाली' सारख्या भूर-भूर पडणारया बर्फाने खच्चून भरलेल्या गोठवून टाकणाऱ्या थंडीच्या अवस्थेत २ उंच डोंगरांच्या मध्ये असलेल्या भयाण दरीत १ min साठी का होईना पण स्वतःला कोणतीही पर्वा न करताना Zip-Lining साठी झोकून देतो आणि मग हवेत असताना ,,दुसऱ्या टोकाला पोहोचेपर्यंत मनात आधी भीती मग आश्चर्य आणि सगळ्यात शेवटी समाधान हे सगळा सुरु असता आणि नकळत आपण ओरडत असतो… त्या ओरडण्यात काहीतरी महान पराक्रम केल्याचा आवेश असतो… ते १ min कितीही वेळा repeat करायला मी तयार आहे … पण असे अनुभव पुन्हा पुन्हा फारसे वाट्याला येत नाहीत .जेव्हा येतात तेव्हा कसलीही पर्वा न करता पूर्णपणे स्वतःला त्यांच्या हवाली करून निश्चिंत राहायचं आणि सुख अनुभवायचं … हेच खरं जगणं असतं असं मला वाटतं … मग त्यासाठी थोडे पैसे खर्च झाले म्हणून कुठे बिघडलं … दुसरीकडे कुठंतरी करू कि त्याग आणि काटकसर… पण इथे नाही . 
                   त्यामुळे शेवटी मला नेहमी असं वाटतं कि या शब्दातीत भावनांचा खेळ सुरु आहे तो पर्यंत आयुष्य व्यवस्थित आहे .तोपर्यंत माणूस हा माणूस आहे , नाहीतर माणूस एखाद्या यंत्रमानवासारखा झाला असता…. या अश्या शब्दात न सांगता येणाऱ्या आणि पैशांनी मोजताना न येणाऱ्या गोष्टीच जीवनाला खरा अर्थ प्राप्त करून देतात … समाजाच्या दृष्टीने त्याचं मोल फार नसेलही कदाचित  पण आपल्या स्वतःसाठी ते सगळ्यात महत्वाचं असतं.माझ्या मते माणूस प्रत्येक क्षणाला बदलत असतो,प्रत्येक घडणाऱ्या घटने सोबत तो काही ना काही नक्की शिकतो.जुन्या संकटांच्या अनुभवामुळे नवी संकट झेलायला तयार असतो आणि जुन्या सुखाच्या अनुभवामुळे ते पुन्हा उपभोगायला उत्सुक असतो . म्हणून असं म्हणावसं वाटतं की  'Am not the same person I was an hour ago, let alone the years gone before   '.  
                   असो हे आपलं माझा वैयक्तिक मत झालं,प्रत्येकाने आपल्या जगण्याची व्याख्या अशीच करावी असा माझा आग्रह अजिबात नाही…   फक्त एक जुनं गाणं आठवलं… 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया ,हर फिक्र को धुएमें उडाता चला गया ' 
                                                                        -ओंकार करंदीकर 

Tuesday, April 29, 2014

मला भावलेले 'पु.ल.' - ओंकार करंदीकर

  मला भावलेले  'पु.ल.'  - ओंकार करंदीकर


Article on Pu.La. Deshpande by Onkar Karandikar

                                                     
           मी साधारण ५-६ वी मध्ये असेन, तेव्हा माझ्या हातात एक निबंध-लेखनाचं (इयत्ता १० वी च्या मुलांचं ) पुस्तक आलं.सहज वाचताना मला त्यात एक 'माझा आवडता लेखक' असा निबंध सापडला. त्यात एक ओळ होती 'विनोदाला कारुण्याची झालर असणारा लेखक' ,ती ओळ होती उभ्या महाराष्ट्राच्या हृदय-सिंहासनावर राज्य करणारे विनोदसम्राट,साहित्यिक,गीत-संगीतकार,नाटककार,नट … विशेषणं कमी पडतील असे  'पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे' यांच्याविषयी. तेव्हा मला त्याचा फारसा अर्थ कळला नव्हता ,पण ती ओळ मात्र माझ्या चांगलीच लक्षात राहिली.
           त्या नंतर काही वर्षांनी हळुहळू जेंव्हा पु.लं नी लिहिलेली 'व्यक्ती आणि वल्ली', 'गणगोत' यांसारखी पुस्तकं  वाचली, 'असा मी असामी' वाचलं , तेंव्हा ती ओळ मला पुन्हा आठवली आणि त्याचा अर्थ उलगडू लागला.खरतर मी  पु.लं .च सगळ्या प्रकारचं  साहित्य वाचलेलं नाही . (ही खरतर माझी घोडचूक आहे )पण जे काही वाचलं त्यावर मनापासून प्रेम केलं. मला नेहमी खंत वाटते की मला कळत्या वयात पु.लं. ना बघता-ऐकता आलं नाही.मला त्यांच्या भाषणांच्या आणि व्यक्तिचित्रांच्या ध्वनिफिती ऐकताना,पुस्तक वाचताना नेहमी असं वाटतं की अरे या माणसाची निरीक्षण शक्ती आणि कल्पना शक्ती किती जबरदस्त असली पाहिजे,कारण समाजात दिसणारे नमुने (त्यात मीही आलोच ) आणि त्याला कल्पनाशक्तीची जोड देऊन त्यांनी उभी केलेली पात्रं (आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला गोवून )ही इतकी अप्रतिम आणि जिवंत वाटतात की सारखं आपल्याला वाटतं राहतं की आपणही त्या लोकांना पु.लं. सोबत भेटलोय की काय!!!
            रत्नागिरीतला कडवट वाणीचा पण आतून प्रेमळ असणारा 'अंतू बरवा' ,तोंडावर शिव्या देणारे पण मित्रांसाठी काय वाट्टेल ते करायला तयार असणारे ,संगीत-नाटकाच्या उद्धारासाठी खपणारे दिलदार 'रावसाहेब',शिवाजी महाराज-रामदास स्वामी ही मंडळी आपल्या पंक्तीला जेवत असल्याच्या थाटात त्यांच्या ,गोष्टी सांगणारे 'हरितात्या' ,कधीही पुस्तकानुरूप(नुसतं पुस्तकी ) न शिकवता विद्यार्थ्यांच्या तळमळीने- आपुलकीने शिकवणारे 'चितळे मास्तर ',लग्न समारंभात स्वयं-सेवाकासारखी धावाधाव करणारा अष्टपैलू 'नारायण', पुस्तकांशी वेड्यासारखा एकनिष्ठ झालेला 'सखाराम गटणे', रेल्वे प्रवासात जगण्यातली गम्मत सांगून जाणारे 'पेस्तन काका '(१०० % ), एकसुद्धा पुस्तक न वाचता बिनधास्त त्यावर परीक्षणं लिहिणारा टीकाकार 'लखू रिसबूड', संस्थाही स्थापन होण्याआधी त्यांचं सेक्रेटरी पद हाती घेणारा' बापू काणे'. .   .
            ही  सगळी  मंडळी एक बढकर एक विनोदी पण त्यात नुसता विनोद नसतो , कारण पु.लं च्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही मनुष्याला फक्त एकच बाजू कधीच नसते ,त्याची एक दुसरी आपल्याला माहित नसलेली दुखरी बाजूही असतेच असते आणि  हीच ती पु.लं. च्या विनोदाला लाभलेली 'कारुण्याची झालर' . जी आपल्या मनाचा ठाव घेते. पु.लंं. ना नुसताच हशा-धमाल करायची नसते ,त्यांना प्रत्येक वेळी त्यातून काही तरी सांगायचं असतं. या सगळ्या पात्रांमध्ये असलेला एक दुखरा कोपरा ,त्या द्वारे ते आपल्या काळजाला हात घालतात  आणि अचानक पोट धरून हसत असताना आपले डोळे पाणावतात …या पेक्षा सामार्थ्याशाली दुसरं काही असूच शकत नाही !! हेच खरं यश आहे.
            त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेला अजून एक अविष्कार म्हणजे 'बटाट्याची चाळ' आणि वाऱ्यावरची वरात'. शिवाय  'असा मी असामी' ,'काही नवे ग्रहयोग','मुंबईकर-पुणेकर-नागपूरकर', 'मी आणि माझा शत्रू पक्ष' ,'माझे पौष्टिक जीवन',ते चौकोनी कुटुंब' , म्हैस,पानवाला, बिगरी ते matric , यांसारखे चौफेर,हसून हसून डोळ्यात पाणी आणणारे लेख आणि मग त्यांचंच खुमासदार पद्धतीने केलेलं वाचन या मधून पु.ल. त्यांच्या सगळ्या पात्रांशी पूर्णपणे एकरूप होऊन जातात पण त्याचवेळी त्यांनी त्यात केलेली त्या त्या काळातील दाखल्यांची गुंफण हे केवळ अद्वितीय आहे.
                त्यांनी जवळ जवळ ५०-६० वर्षांपूर्वी लिहिलेली हि व्यक्तिचित्र आजही तितकीच ताजी आणि हवीहवीशी वाटतात की माझ्यासारख्या कॉम्पुटर-स्मार्टफोन च्या जमान्यातल्या एका तरुण मुलाचा mobile पु.लं.च्या audio clips नी अभिमानाने भरावा इतकं कालातीत लिखाण त्यांनी केलय. 'अपूर्वाई' आणि 'पूर्वरंग' ही प्रवास वर्णनात्मक पुस्तकं कोणालाही आपल्या बुकशेल्फ वर असावीत अशी आहेत.शिवय त्यांनी कित्येक नाटकं लिहिली आहेत. त्या पैकी 'ती फुलराणी' हे नाटक मी पाहिलंय. अविनाश नारकर आणि अमृता सुभाष यांचा अप्रतिम अभिनय त्यात आहे .  
                खरतर मी पु.लं. बद्दल लिहिणं  म्हणजे 'काजव्याने सुर्याविषयी बोलण्यासारखं आहे '(अर्थात सखाराम गटणेचे हे शब्द मला म्हणावेसे वाटले तर त्यात नवल नाही ). पण पु.लं. विषयी वाटणारा आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी इतकं तरी लिहिण्याचं धाडस मी केलं. आज पु.लं आपल्यात नाहीत पण त्यांनी अजरामर केलेली ही सगळी पात्रं आपली नेहमीच सोबत करतील आणि सतत त्यांची आठवण करून देतील यात तिळमात्रही शंका नाही.
               असो या महाकाय-चतुरस्त्र माणसाविषयी कितीही लिहिलं तरी कमीच!! त्यामुळे आता थांबलेलंच बरं आणि त्यांनी लिहून ठेवलेलं वाचायला वाचायला प्रारंभ करणं हे अधिक उत्तम.
                                                                                   -ओंकार करंदीकर.